अधिकाऱ्यानी विषयाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून न्यायनिष्ठ निर्णय घ्यावेत, त्याच विषयावर वारंवार अपील होण्याची वेळ येणार नाही, : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.
निर्णय घेताना कायदे, नियम, शासन धोरणे न्यालयीन निर्णय व स्थानिक परिस्थितीचा विचार करावा.

नाशिक | प्रतिनिधी दि. 23
प्रत्येक अधिकाऱ्याने विषयाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून न्यायनिष्ठ निर्णय घ्यावेत. जेणेकरून त्याच विषयावर वारंवार अपील होण्याची वेळ येणार नाही, प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिककेंद्री करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागप्रमुखांची साप्ताहिक बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत प्रशासनातील कामकाज अधिक सुलभ करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
शासनाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, वेळबद्ध व नियमाधारित प्रशासनाचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. नागरिकांना शासनसेवा घेताना येणारा अनुभव अधिक चांगला करण्यावर भर द्यावा. तहसील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एकात्मिक ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करून फाईल हालचाल गतिमान करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
फाईल तपासणी व निर्णय प्रक्रिया अधिक जलद व अचूक होण्यासाठी चेकलिस्ट पद्धतीचा अवलंब करावा, असे निर्देश देत जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेली १२४ उद्दिष्टे पुढील महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांच्या कामगिरीचा सखोल आढावा घ्यावा. कमी कामगिरी करणाऱ्या यंत्रणांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या विषयाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून न्यायनिष्ठ निर्णय घ्यावेत, जेणेकरून त्याच विषयावर वारंवार अपील होण्याची वेळ येणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी नमूद केले. निर्णय घेताना कायदे, नियम, शासन धोरणे, प्रशासकीय परिपत्रके, न्यायालयीन निर्णय तसेच स्थानिक परिस्थिती यांचा समन्वयाने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, कुंदन हिरे यांच्यासह तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
