एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम.
प्रवाशांच्या सुरक्षित व आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार.

मुंबई, प्रतिनिधी दि. ३१ : प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटी महामंडळाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष तसेच बसस्थानक परिसराची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे, जाळी-जळमट, जुने जाहिरातींचे फलक हटवून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे ठेवून कचऱ्याचे वर्गीकरण व योग्य विल्हेवाट लावली जाणार असून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी नियमित स्वच्छता व देखभाल ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या स्वच्छता अभियानात स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग घेणार आहेत. प्रत्येक बसस्थानकावर मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी होईल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.
दर १५ दिवसांनी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून प्रवासी सेवेत गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

