नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल
ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य
मंञीमंडळ निर्णय.
मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५
नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी, नागपूर जिल्हा बँकेला ८१ कोटी आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांचे पुनर्भांडवलीकरण व पुनरूज्जीवन करण्याबाबत शासनास कळवले होते. त्यानुसार आज या तीनही बँकांना भागभांडवल स्वरूपात अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.
शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जिल्हा बँकांच्या आर्थिक स्थितीवर सेवाविकास संस्थांचे अस्तित्वही अवलंबून असते. त्यामुळे या तीनही बँकांना एकूण ८२७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा बँकेस यंदाच्या आर्थिक वर्षात ३३६ कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात ३३६ कोटी रुपये वितरित करण्यात येतील.
सध्या नाशिक आणि नागपूर जिल्हा बँकांवर प्रशासक कार्यरत आहेत. धाराशिव जिल्हा बँकेवर संचालक मंडळ कार्यरत असले तरी बँकेची स्थिती खालावत आहे.

